Friday, February 11, 2022

शिवाजी महाराज जयंती भाषण २

शिवाजी महाराज जयंती भाषण २ अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. शब्दही अपुरे पडती अशी शिवरायांची कीर्ती। राजा शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती ॥ 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस उजाडला. आणि अशा या मंगलक्षणी शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला आणि हेच आपले शिवाजी राजे. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवीत होत्या. अशा परिस्थितीत बलाढ्य सत्तांशी शूर मावळ्यांच्या साथीने झुंज देत शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. शिवराय हे जिजामाता आणि शहाजीराजे यांचे पुत्र. शिवरायांना शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही. मात्र वीर जिजामातेने संस्कारांचे बाळकडू देऊन, राम, कृष्ण, भीम, अर्जुन अशा वीरांच्या गोष्टी सांगून छत्रपतींच्या मनाला, व्यक्तीमत्त्वाला आकार दिला. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. घोडेस्वारी, दांडपटटा चालवणे, तलवारबाजी अशा अनेक विदया त्यांनी पारंगत केल्या. गनिमी काव्याने लढा देत पुरंदर, कोंढाणा, रायगड, प्रतापगड असे अनेक किल्ले जिंकले. स्वराज्याचा विस्तार केला. पन्हाळगडाला वेढा, शायिस्ताखानाची फजिती, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, बादशहाच्या हातावर तुटी दिल्या, आग्र्याहून सुटका अशा अनेक घटनांमधून त्यांचे असीम शौर्य, प्रसंगावधान, चातुर्य या गुणांचे दर्शन होते. शिवरायांच्या या इतर प्रवासात त्यांना जिवा महाला, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे अनेक शुरवीर मावळ्यांची अनमोल साथ मिळाली. शिवरायांनी नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. सर्वधर्मसमभाव, स्त्रियांप्रती आदरभाव या न्यायाने ते वागले आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले.शेवटी एकच म्हणावेसे वाटते.... किती आले, किती गेले .....केले मुघलांना हद्दपार । राजे बहु धरतीवरती ना कुणा शिवबांची सर ॥

No comments:

Post a Comment