छान छान गोष्टी

छान छान गोष्टी

बोधकथा १ -उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही..
एका गृहस्थाकडं त्याचा एक आंधळा मित्र गप्पा मारायला आला होता. गप्पा इतक्या रंगल्या की, अंधार कधी पडला ते त्या सद् गृह्स्थाला कळलेही नाही. मग मित्र जायला निघताच त्यानं त्याच्या हाती कंदिल दिला आणि तो मित्राला म्हणाला,"बाहेर खुप अंधार आहे.त्यामुळे तू हा कंदील घेवुन जा."
यावर तो आंधळा मित्र आश्र्चर्यान म्हणाला, "अरे बाबा, मी तर असा ठार आंधळा आहे.मला अंधार आणि उजेड सारखेच.मला या कंदिलाचा काय उपयोग…?
"हा कंदील तुझ्या साठी नाहीच. डोळस माणसासाठी आहे.या उजेडा मुळं कुणीही वाटसरू तुझ्या अंगावर आदळणार नाही."तो सद् गृहस्थ म्हणाला.
हे आंधळ्या मित्राला पटलं. तो कंदील घेवुन चालू लागला.
मात्र थोड्याच वेळात एक माणुस त्याच्या अंगावर आदळला.संतापानं आणि आश्र्य्चर्याँन आंधळा मनुष्य ओरडला,"अरे , अरे, काय चाललंय तुझं ? माझ्या हातातला हा पेटता कंदील तुला दिसत नाही का ? "
त्यावर जास्तच आश्च्यर्यान तो वाटसरू म्हणाला ," अरे भाऊ, तुझा कंदील कधीच विझून गेलाय.हे तुझ्या लक्ष्यात नाही आलं…?"
हे ऐकताच आंधळा मोठ्यानं हसला आणि म्हणाला,"नाही लक्ष्यात आलं.पण आज एक गोष्ट मात्र कळली……
उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही…
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बोधकथा  २ -फुलाचा सुगंध मातीला
मी तेव्हा एका खाजगी शाळेत होतो.
नवीन होतो.नवा जोश असल्यामुळे मनापासून सगळं करायचो.आतासारखंच.शाळेचे दोन युनिट होते. प्राथमिक, माध्यमिक असे.मी माध्यमिकला होतो.
काही पालकांनी प्राथमिक मधून मुलं माध्य.मधे टाकल्यामुळे प्राथमिकचे काही शिक्षिका नाराज होत्या.
एके दिवशी वर्गावर मी अजून गेलो .नव्हतो.एक बाई वर्गात डोकावून, " कुणाच तास आहे रे"?
"पाटील सरांचा" मुलं
दोघी काही तरी कुजबुजल्या.अन् लगेच धावत मी वर्गापर्यंत पोहचलो.
" आले पहा धावत जसा यांना पुरस्कारच मिळणार आहे" दोघी शिशिकांमधील हा संवाद मी ऐकला.
मी हा विषय थेट संस्थाप्रमुख, शिक्षक यांच्या सभेत मांडला.
तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते 20 वर्षांनी मला आजही आठवतं.
" सर, फुल मातीत पडतं तेव्हा फुलाचा वास मातीला लागतो.
मातीचा वास फुलाला लागत नाही." आणि लागू ही  नये.
एवढं लक्षात ठेवून काम करा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बोधकथा ३ -
स्वकीयांचा त्रास 
एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे
दुकान होते.

सोनार जेव्हा काम करत असे
तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत
असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र
लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे.

तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके
दिवशी सोनाराच्या दुकानातील एक
सोन्याचा कण कसा कोण जाणे पण
लोहाराच्या दुकानात जावून पडला.

त्या सोन्याच्या कणाची भेट
एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख
असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले.

सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले, "दादा,
आपले दुःख तर खरे एकसमान आहे. 

दोघानाही आगीत
तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर
बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?"

लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून
दुःखी स्वरात म्हणाला," अरे तुझे म्हणणे
अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच
आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे.

पण खरे दुःख याचे आहे
कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत
नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने
माझा भाऊच लागतो.

'' दुसऱ्याने
दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास
हा अगदी हृदयात वार करून जातो...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बोधकथा ४-आत्मविश्वास 
आर्थर अँश हा विम्ब्लडनमधील अतिशय
नावाजलेला टेनिसपटू होता.

१९८३ मध्ये
त्याच्या हदयावर शस्ञक्रिया करावी लागली.
त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे
त्याला एड्सची लागण झाली.

त्यानंतर
त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पञे येत राहिली.
त्यातील एका पञात म्हटले होते...
इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ?

या पञाला उत्तर देताना आर्थर म्हणतो...

५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस
खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक
टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस
सर्किटमध्ये दाखल झाली,
त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम
स्पर्धेसाठी निवडली गेली. त्यातील फक्त ५० टेनिसपटू
विम्बलडनसाठी
निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे
अंतिम फेरीत पोचले.
त्या दोन
जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी विजेतेपदाचा करंडक
उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले
नाही की, माझीच निवड का केलीस ? मग आत्ताच
वेदना होत असताना माझीच निवड का केली,
असे मी देवाला कसे विचारु ?

सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस
बनवते...अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बोधकथा ५-स्वताचे मूल्य 
एका ख्यातनाम वक्त्याने हातात

पाचशेची नोट फडकावीत भाषणाला सुरुवात

केली. समोर बसलेल्या शेकडो श्रोत्यांना

त्याने प्रश्न केला,"ही पाचशेची नोट कुणाला

हवी आहे?" हळूहळू करता करता असंख्य

जणांनी हात वर केले. मग तो वक्ता म्हणाला,

"आपणापैकी कुणा एकालाच मी ही पाचशेची

नोट देणार आहे, पण त्यापूर्वी मला हे करू

द्या." असं सांगत त्याने ती नोट चुरगाळून

टाकली आणि पुन्हा श्रोत्यांना प्रश्न केला,

"आता ही नोट कुणाला हवी आहे?"

श्रोत्यांमधून पुन्हा एकवार असंख्य हात 

उंचावले. "अच्छा ! आणि मग मी असं केलं 

तर?" असं म्हणून त्यानं ती नोट पायदळी 

तुडवली आणि हाताने उचलून मातीने मळलेली 

आणि पूर्ण चुरगळलेली ती नोट सर्व 

श्रोत्यांना दाखवीत पुन्हा प्रश्न केला,"आता 

ही नोट कुणाला हवी आहे?" श्रोत्यांमधून 

तरीही पुन्हा एकवार असंख्य हात उंचावले. मग 

त्या वक्त्याने या घटनेचं निरूपण केलं,"आज 

आपण एक आयुष्यातला खूप मोठा धडा 

शिकलो आहोत. या नोटेबाबत मी काय वाट्टेल 

ते केलं, तरीही ही नोट स्वीकारण्याची तुमची 

तयारी होती. कारण या नोटेसोबत मी काहीही 

केलं- म्हणजे तिला चुरगळलं, पायदळी तुडवलं 

तरी तिचं पाचशे रुपये हे मूल्य अबाधित आहे, 

याची जाणीव तुम्हाला होती. आयुष्यात खूप 

वेळा असं घडतं, की आपण घसरतो, पडतो, 

हरतो. खूप वेळा आपले निर्णय आपणाला 

जमीनदोस्त करतात आणि आपणाला वाटू 

लागतं की, आपली काहीच किंमत नाही. पण 

आपणासोबत जे झालं किंवा भविष्यात जे काही 

होणार आहे, त्यामुळे आपली किंमत कमी 

होणार नाही, याची स्वतःच्या मनात खात्री 

बाळगा. भूतकाळातील काळोखाचा भविष्यातील 

उषःकालावर परिणाम होऊ देऊ नका. तुमचं 

आयुष्य ही तुम्हाला मिळालेली अतिशय 

मौल्यवान गोष्ट आहे. आयुष्यातील पडझडींनी 

त्याचं मूल्य तसूभरही कमी होणार नाही
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बोधकथा ६- अनुभवाच्या जोरावर यश 


एका व्‍यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्‍यापार करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍याच्‍या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्‍यापारी म्‍हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्‍याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्‍यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्‍यापा-याने विचार केला, आपण पहिल्‍यांदा जाण्‍यात फायदा आहे, रस्‍त्‍याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्‍या किंमतीवर सामान विकेन. त्‍याने पहिल्‍यांदा जाण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या व्‍यापा-याला वाटले, या व्‍यापा-याच्‍या जाण्‍याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्‍या खोदलेल्‍या विहीरीचे पाणी प्‍यायला मिळेल. शिवाय चांगल्‍या किंमतीवर सौदा करता येईल. दुस-या व्‍यापा-याच्‍या माणसांनी पाण्‍याने भरलेल्‍या घागरी बरोबर घेतल्‍या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्‍यांना भेटले, त्‍या लोकांनी व्‍यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्‍याची गरज नाही. व्‍यापा-याने त्‍यांचा सल्‍ला ऐकला. त्‍या रात्रीच त्‍या व्‍यापा-याचा काफिला लुटला गेला. व्‍यापारीही मारला गेला.एक महिन्‍याने पहिला व्‍यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्‍हा दरोडेखोराच्‍या माणसांनी त्‍यालाही खोटे बोलून भुलविण्‍याचा प्रयत्‍न केला पण पहिला व्‍यापारी त्‍यांच्‍या बोलण्‍याला भुलला नाही. व्‍यापा-याच्‍या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्‍यापा-याला विचारले असता व्‍यापारी म्‍हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्‍यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्‍यापारी पुढे गेला व त्‍याच्‍या धंद्यात अशा छोट्याशा गोष्‍टींमुळे तो यशस्‍वी झाला.


तात्‍पर्य : अनुभवाने माणूस यशस्‍वी होतो. 
---------------------------------------------------------------------------------------------
बोधकथा ७-संत राबिया आणि चोर 
संत राबियाची ईश्‍वरभक्‍ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्‍वराचे स्‍मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्‍वरनिर्मिती मानून त्‍यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्‍त असताना तिच्‍या घरात चोर घुसला. त्‍याला राबियाच्‍या घरी धन तर सापडणार नव्‍हते. त्‍याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. त्‍याने समोर पडलेली चादर उचचलली. चादर घेऊन तो जात असताना त्‍याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली, काही दिसेनासे झाले, त्‍याने डोळे चोळून पाहण्‍याचा प्रयत्‍न केला पण त्‍याचा काहीच फायदा झाला नाही. त्‍याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्‍याला थोपटून पाहिले. तेव्‍हा त्‍याला बरे वाटले. चादर उचलून तो चालू लागला की तेव्‍हा पुन्‍हा त्‍याची तीच अवस्‍थ झाली. चादर खाली ठेवली की त्‍याला बरे वाटत असे. तो हैराण झाला. तेव्‍हा त्‍याला कोणीतरी म्‍हटल्‍याचा भास झाला,’’ तू स्‍वत:ला का अडचणीत टाकतो आहेस, राबियाने स्‍वत:चे अस्तित्‍व माझ्याकडे सोपवून दिले आहे. जेव्‍हा एक मित्र झोपतो तेव्‍हा दुसरा जागा असतो. मग त्‍याची कोणतीही वस्‍तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन’’चोराने तेथे निद्रिस्‍त असलेल्‍या राबियाचे चरणस्‍पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला.

तात्‍पर्य :-ईश्‍वराशी आपण एकरूप झालो की ईश्‍वरही आपली मनापासून काळजी करतो.
---------------------------------------------------------------------------------------
बोधकथा ८-मनाची एकाग्रता 


एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती. त्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्‍य' हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात'' तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,'' मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''


तात्‍पर्य : मनाची एकाग्रता साधल्‍याने बरेचशी कामे साध्‍य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्‍यास हमखास यश मिळतेच.


चतूर न्यायमुर्ती

एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.

आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, 'अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?'

जुना मालक म्हणाला, 'मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.' 


या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, 'तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?'

जुना मालक - होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही.

न्यायमुर्ती - तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे. 


जुना मालक - (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !

न्यायमुर्ती - ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.'

न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.



सुंदर मुकुटाची गोष्ट


एक मजेदार गोष्ट आहे. सिसीली मधील एक राज्य सेरक्युज. तिथला ख्रिस्तपुर्व तिसऱ्या शतकातला राजा हिरो-II. त्याच्या दरबारात एक अवलिया होता. आर्किमिडीज त्याचं नाव. राजानं सोन्याचा एक सुंदर नक्षीदार मुकुट बनवून घेतला होता. पण सोनारानं लबाडी करून त्यात भेसळ केली असावी असा संशय त्याला आला. हे खरं की खोटं हे शोधून काढायचं कठीण काम त्यानं आर्किमिडीजला दिलं. त्या काळच्या तंत्रज्ञानानुसार सोन्याचा खरेपणा शोधायचे दोनच रूढ मार्ग होते, एकतर भट्टीत टाकून तापवून नाहीतर तीव्र आम्लामध्ये बुडवून पहाणं. दोन्हीमध्ये तो सुंदर नक्षीदार मुकुट खराब होणार. निदान तशी शक्यता होतीच. तसे न करता त्यातील सोन्याचा कस कसा मोजायचा हे एक फक्त आर्किमिडीजलाच नव्हे तर दरबारातील साऱ्याच विद्वत्तेपुढे आव्हान होते. त्यासाठी सोन्याच्या तिस-याच कुठल्यातरी गुणधर्माचा उपयोग करता येईल कां असा विचार आर्किमिडीज करीत होता. पाण्याच्या टबात उतरल्याबरोबर त्याला पाण्याच्या उध्दरणशक्तीची जाणीव झाली व त्याचा उपयोग सोन्याची घनता मोजण्यासाठी करता येईल ही नामी कल्पना सुचली. मनावरील एक मोठे दडपण उतरल्यामुळे त्याला इतका आनंद झाला की अंगावर कपडे चढवण्याचं सुध्दा भान राहिलं नाही. कुठल्याही कारणाने अत्यंत भावनावेग झाला की माणसाचं देहभानसुध्दा हरपतं. “युरेका ! युरेका !” असं ओरडतच तो राजाच्या दरबारात हजर झाला. आणि ….. आर्किमिडीजने द्रवाच्या उध्दरणशक्तीचा शोध लावला.”
गोष्ट आर्किमिडीजचीही नाही आणि द्रवाच्या उद्धरणशक्तीचीही नाही. सेरक्युजचा तिसऱ्या शतकातला राजा हिरो-II ची तर नाहीच नाही. गोष्ट आहे ती त्या सुंदर नक्षीदार मुकुटाची. मुकुटाचं सौंदर्य असं की त्यापुढे सोन्यासारख्या मौल्यवान धातुचं मोल देखील कमी झालं. त्याची शुद्धाशुद्धता गौण ठरली. त्या सोन्यातली भेसळ शोधण्यासाठी ते सौंदर्य नष्ट करणे राजालाही परवडले नाही.
जीवनाचही असंच असतं. जीवनातलं सौंदर्य जपण्यासाठी त्यातल्या शुद्धाशुद्धतेला कसलाही कस लावणं कोणालाच परवडणारं नाही.
पहा थोडा सारासार विचार करून. आणि …. सांगा कशी वाटली ही गोष्ट ?

एकलव्याची गोष्ट....

एकलव्याची गोष्ट.... मी एकलव्य आषाढातील पौर्णिमेस 'गुरूपौर्णिमा' म्हणतात. गुरूंच्या आशीर्वादासाठी, त्यांच्या शिकवणीसाठी तसेच गुरूंच्या प्रति निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भगवान वेदव्यास हे फक्त प्रज्ञावान ऋषीच नसून एक महान वैज्ञानिक व महान शास्त्रज्ञ होते. आपल्या भारतवर्षामघ्ये 'नमोस्तुते व्यास विशालबुध्दे।' असे म्हणून, या दिवशी घरोघरी व्यासपूजा करतात. अशा व्यासांच्या असामान्य प्रतिभेने शब्दांकित झालेले महाभारत... असं म्हणतात की या जगात अशी कुठलीही घटना, कथा, वा वेदना नाही, जिचा उल्लेख महाभारतामध्ये झालेला नाही. वेदविद्या पारंगत महर्षी द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अतुलनीय ज्ञान आणि युध्दतंत्र याकरिता महर्षी द्रोणाचार्यांची ख्याती होती. एकलव्य हा एका आदिवासी पुत्र. द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या संपादन करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. एकलव्याच्या शब्दांत त्याची कैफियत पुढे मांडली आहे. मी एकलव्य... तो दिवस माझ्या हृदयावर कोरून ठेवला गेला आहे, ज्या दिवशी मी माझ्या गुरूंना प्रथम पाहिले. होय, गुरू द्रोणाचार्य. उत्कृष्ट शिक्षक,शस्त्रहाताळणीमध्ये निपुण, विशाल ज्ञान आणि विद्वत्ता यांचा जणू सागर. त्यांच्या चेह-यावरचं तेज तर सदैव मनाला टवटवी देणारं आहे. गुरूजी, मी सदैव तुमचा आहे. सदैव तुमचा राहीन. होय. मी भिल्लाचा पोर आहे. मला तुमच्या ऋचा ठाऊक नाहीत. ठाऊक आहे, वनात बागडणं. मनसोक्त गीते गाणं, पोहणं आणि त-हेत-हेची फळं औषधी यांचे जतन करणं... झाडांवर प्रेम करणं... माझं धनुष्य, बाण आणि बाणांचा भाता हाच एकमात्र माझा आग्रह/हट्ट, जिव्हाळा आणि ध्येय... हे असं नेहमीच घडतं. प्रस्थापितांचं संरक्षण. त्यांची कोडकौतुके पुरविली जाणं हा तर रिवाज आहे. पण मी देखील एक उत्तम धनुर्धारी आहे, माझेही काही हक्क आहेत. हे या राजकुमारांच्या मांदियाळीमध्ये कोण लक्षात ठेवणार? मला काय हवं होतं? फक्त विद्या हवी होती. तुमच्याचकडून मला धनुर्विद्या शिकायची होती. हीन कुळातील म्हणून तुम्ही माझा अव्हेर केलात. तुम्हाला अर्जुन फार प्रिय होता... तो दिवस माझ्या हृदयावर कोरून ठेवला गेला आहे, ज्या दिवशी धनुर्विद्या देण्याला तुम्ही नकार दिलात. मला रडता आलं असतं. राग धरता आला असता. चिडचिड करता आली असती. नाहीतरी अरण्यात राहणा-या मुलाचा दंगा म्हणून सोडून दिलं असतं सा-यांनीच माझं वागणं. पण मला सुचला एक सुंदर विचार. एक ठाम प्रकाश त्या विचाराबरोबर वाहात वाहात आला माझ्या मनात. नदीच्या झुळणुळणा-या पाण्यातून. वा-यांच्या तालातून आणि मनाच्या खोल आतल्या गाभ्यातून. विचार असा होता, की जर तुम्ही माझे आहात, जर मी तुम्हाला पाहू शकतो, अशी भावना करू शकतो की तुम्हीच मला सर्वोत्तम, उच्चतम धनुर्विद्या शिकवत आहात, तर ती शिकवणी किती आगळीवेगळी किती थोर असेल! तुमचे अस्तित्त्व माझ्या मनात कायम होते. निराश होणं कधी मंजूर नव्हतंच. हारही मानायची नव्हती. मग काय उठलो. जिद्द आशा यांच्या प्रवाहात अंगांग न्हाऊन काढलं. आणि पर्णकुटीपाशी आलो. तुमच्या व्यक्तित्त्वाचा एक एक पैलू आठवत राहीलो. ते पैलू मातीच्या मूर्तीमध्ये सामावून जावेत म्हणून घडत राहीलो. घडवत राहीलो... धनुष्य, प्रत्यंचा, बाण, माती, तुमची मूर्ती आणि स्वत:ला सुध्दा... मग हे रोजचंच झालं. गुरूदेव आपलं गुरूकुल म्हणजे ही पर्णकुटी. आणि मोकळं मैदान, जंगलं ही आपली पाठशाळा. सतत सराव. निधिध्यास. दिवस रात्र केलेलं चिंतन. नेमबाजी, उंचावरील वस्तूचा अचूक वेध घेणे. आकाशातून, चल असताना नेम साधणं, स्वप्नांच्या चांदण्यांनी डवरून जायचं माझं मन. सभोवतीचं आवार, तुमचा पुतळा आणि आसमंतात भरून येणारी रात्र. बस निघालो. करत राहीलो. चालत राहीलो... किती, कसा, कधी, काहीच कळलं नाही. मग मात्र एक दिवस 'माझा' आला. सारे विद्यार्थी, राजे रजवाडे, गुरूजन यांना थक्क करून टाकणारे धनुर्विद्येचं प्रदर्शन त्या दिवशी घडलं. ते मी करत होतो. आणि सारे तथाकथित निपुण लोक पाहात होते. ही करामत फक्त गुरूंचा आशीर्वादच करू शकतो, हे यांना कोण सांगणार? सातत्य, साधना आणि चिंतन यांची ती बीजे होती. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना, मी मागीतलाही नसताना एक दिवस 'माझा' आला. माझ्या जयकाराने व माझ्या नावाच्या उच्चाराने, कौतुकाने सारा आसमंत भरून गेला.तुम्ही आश्चर्यचकित होऊन विचारलंत मला, की कोणाकडे ही विद्या शिकलास? मी तुम्हाला आदराने वंदन केले. पर्णकुटीच्या मागील परसात घेऊन गेलो. तुम्ही पाहिलीत तिथे तुमचीच प्रतिमा. स्वत:च्याच पुतळयाकडे पाहून तुमच्या नयनांतून घळघळ अश्रू ओघळले. मला मुक्त कंठाने, मनापासून आशीर्वाद दिलात, तो दिवस माझा होता... नंतर मग काय झालं, कुणास ठाऊक? पण गुरूदक्षिणा द्यायची व मागायची वेळ आली. आणि मी तर सांगितलं की काहीही मागा. तुम्ही मात्र मागितलात, माझ्या उजव्या हाताचा अंगठा! तुम्हाला ठाऊक नाही असे नाही. अंगठयाशिवाय धनुर्धारी कसा काय सर्वश्रेष्ठ ठरणार. माझ्या खूप गोष्टी कानावर आल्या. अर्जुनाला कुणीही स्पर्धक राहू नये, तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असावा, यासाठी तुम्ही असं केलंत... असेलही... पण खरं सांगतो गुरूदेव, मी लागलीच तुमची गुरूदक्षिणा दिली. तेंव्हा मी मोकळा झालो, आणि तुम्ही मात्र अडकलात. पाप-पुण्यांच्या दुष्टचक्रात. राजनीतीच्या अन्यायी सापळयांत. मला खरोखरी कींव वाटली तुमची. अन्याय नाही वाटला. गुरूंनी मागितलेल्या गोष्टीचा अन्याय वाटला, तर तो खरा शिष्य असतो का? तुम्ही मला धनुर्विद्या शिकविण्यास नकार दिलात, त्या दिवशी संताप वाटला. असं वाटलं, का मी हीन कुळातला आहे? पण जेंव्हा तुम्ही अंगठा मागितलात ना, तेंव्हा मला सामोरं आलंच नाही, कुठलंही द्वंद्व. कुठलेही प्रश्न. किंवा कुठल्याही समस्या. अहो,कारण सोपं आहे. आधी माझ्याकडे काहीच नव्हतं, देण्यासारखं, आणि आता इतकी पुण्याई गाठवली की, तुम्ही मागितलंत ते मी देऊ केलं. देऊ शकलो. माझ्याकडे देण्यासारखं काहीतरी होतं. आजही आहे... टाळून टळण्यातला शिष्य मी नाही. मला टाळलंत, पण शेवटी येणा-या पिढया जेंव्हा जेंव्हा एकलव्याचे नाव घेतील तेंव्हा तेंव्हा त्यांना गुरू द्रोणाचार्य जरूर आठवतील. आणि प्रत्येक धनुर्धा-याच्या अंगठयाने मीच पुढे चालवत राहीन, हा घेतलेला वसा. तुम्ही मला शुभाशिर्वाद द्या, गुरूदेव... 'महाभारतातील पात्रांचे एक वैशिष्टय म्हणजे, प्रत्येकाला अन्याय झेलावा लागला आहे. घरच्या गरिबीमुळे आपला मुलगा अश्वत्थामा याला पीठाचे पाणी दूध म्हणून गुरू द्रोण यांना पाजावे लागले. मनोमन अर्जुनाला वरूनही द्रौपदीला पाच पतींशी संसार करावा लागला आहे. यात कृष्ण आणि विदूर यांना मात्र कायम समतोल राखता आला... अन्यायाला हसत हसत सामोरा जाणारा आणि जीवनापेक्षाही भव्य असा एकलव्य आजही आपल्या स्मृतीमध्ये हुरूप उत्साह, कष्टांचा पायंडा आणि एक ठसठस बनून राहीला आहे.

न संपणारी गोष्ट


एका राजकन्येला गोष्टी ऎकण्याचा भलताच छंद लागला. कुणालातरी तिच्या जवळ बसून सतत गोष्ट सांगत रहावे लागे. परंतू गोष्ट संपली रे संपली की तिला अस्वस्थता वाटायला लागे !


अखेर एकदा राजाने जाहीर केले, 'जो मनुष्य आतापासून, ते थेट राजकन्येचा विवाह होऊन ती सासरी जाईपर्यंत तिला तिच्या मोकळ्या वेळेत एक न संपणारी गोष्ट सांगत राहील, त्याला मासिक एक हजार सुवर्ण मोहोरांचे वेतन दिले जाईल.' 

राजाने राज्यात पिटवलेली ही दवंडी ऎकून राज्यातलेच नव्हे, तर इतर राज्यातलेही अनेकजण तिला गोष्ट सांगण्यासाठी राजवाड्यात आले. पण ताणून ताणून कुणी आपली गोष्ट महिन्या-दोन महिन्यांपेक्षा जास्त ताणू शकला नाही. 

एके दिवशी एकजण राजवाडयावर आला व त्याने अशी न संपणारी गोष्ट राजकन्येला सांगण्याची आपली तयारी असल्याचे राजाला सांगितले. राजाने त्याची बसण्याची व्यवस्था केली. थोड्याच वेळात राजकन्या त्याच्यासमोर येऊन बसली आणि त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली.- 

'एक होते भातगाव नावाचे गाव. त्या गावात आठ मैल लांबीचे, चार मैल रुंदीचे आणि दोन मैल उंचीचे, भातानी भरलेले प्रचंड मोठे कोठार होते. त्या भाताच्या अवाढव्य कोठारामुळेच त्या गावाला 'भातगाव' हे नाव पडले होते.' 

शेजारी दुसरे गाव होते. तिकडे चिमण्याच चिमण्या होत्या. म्हणून त्या गावाचे नाव 'चिमणपूर' असे पडले होते.' 

राजकन्या उत्साहानं म्हणाली, 'अय्या ! मोठी मजेशीर आहे नाही का ही गोष्ट. पण इतकी मजेशीर असलेली ही गोष्ट न संपणारी आहे ना ?' 

गोष्ट सांगणारा म्हणाला, 'न संपणारी आहे, म्हणून तर मी आपल्याला सांगायला आलोय ना? पण कलावती राजे ! आपण आता मध्येच बोलू नका. मी सांगतोय ती गोष्ट निमूटपणे ऎका.' 

याप्रमाणे बोलून तो गोष्ट सांगणारा पुढे म्हणाला, 'एकदा काय झालं? कशी कोण जाणे, पण भातगावच्या त्या भाताने भरलेल्या कोठाराची चिमणपूरच्या एका चिमणीला बातमी मिळाली ! ती उडत उडत त्या भातगावच्या कोठारापाशी आली त्या कोठाराला पडलेल्या फ़टीतून आत शिरली. तिनं त्या कोठारातला भाताचा एक दाणा चोचीत धरला आणि ती चिमणपूरला उडून गेली ! 

'सुहास्यवदनाने चोचीतून दाणा घेऊन घरट्याकडे जाणा-या त्या चिमणीला पाहून दुसरी चिमणी म्हणाली, 'चिमूताई ! चिमण्यांच्या अफ़ाट संख्यावाढीमुळे गावात अनेक चिमणे चिमण्या अन्नान्न करुन मरत असताना, तू आंबेमोहरी भाताचा हा टपोरा दाणा कुठुन ग आणलास?' त्या चिमणीनं खर ते सांगून टाकताच दुसरी चिमणी त्या कोठाराकडे गेली व आत शिरुन त्यातला एक दाणा घेऊन स्वगृही गेली!' 

'अय्या ! किती बहारदार त-हेनं सांगता हो ? सांगा सांगा. पुढं काय झालं ते सांगा.' राजकन्या उत्कंठेनं म्हणाली. 

'पुढं काय सांगायचं ? जे व्हायचं होतं ते झालं ! तिसरी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. चौथी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. पाचवी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. अकरावी चिमणी आली, दाणा घेऊन गेली .. बत्तीसावी... सत्तरावी....एकशे एकावी चिमणी आली, दाणा घेऊन गेली !' 

सहनशीलतेचा अंत होऊन राजकन्या म्हणाली, 'किती च-हाट लावता हो ? कधी संपणार हे तुमचं च-हाट?' 

गोष्ट सांगणारा म्हणाला, 'त्या प्रचंड कोठारातलं धान्य संपेपर्यंत, ते संपूण गेल्याशिवाय मला पुढची गोष्ट सांगताच येणार नाही.' 

राजकन्या म्हणाली, 'मग त्या कोठारातलं धान्य संपवायलाच तुम्ही दहा वर्षे घ्याल.' 

गोष्ट सांगणारा म्हणाला, 'कलावती राजे, तुमचं लग्न होऊन तुम्ही सासरी जाईपर्यंत तरी काही त्या कोठारातलं धान्य संपून जाण्याची शक्यता नाही.' 

यावर राजकन्या राजाकडे गेली व म्हणाली, ' मला आजची गोष्ट ऎकत असता, एकंदरीत 'गोष्ट' या गोष्टीचा एवढा वीट आला आहे की, यापुढे मला कुणी गोष्ट सांगू नये, आणि मी ती ऎकू नये, असं वाटू लागलंय !' 

गोष्ट सांगणा-याने सुरु केलेल्या गोष्टीचे स्वरुप राजाने राजकन्येकडून समजावून घेतले. तो मनात म्हणाला, ' गोष्ट सांगणा-याने बनवले असले, तरी त्या च-हाटदार गोष्टीमुळेच वीट येऊन, आपल्या कन्येचा एक अतिरेकी छंद सुटला.' राजाने या गोष्टीचा आनंद मानला, आणि न संपणारी गोष्ट सांगायला आलेल्या त्या माणसाला त्यानंतर त्याने गोष्ट न सांगताही, मासिक एक हजार मोहोरांचे वेतन सुरु केले.



परीस

एक माणूस परीस शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा....शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले... ती साखळी सोन्याची झाली होती..... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही....

तात्पर्य:

प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने ..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......


‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’

No comments:

Post a Comment